फॉलोअर

अँग्री यंग मेन

 



“आज ! खुश तो बहोत होगे तुम” हा डायलॉगच एवढा दमदार आहे, की तो चित्रपटगृहांत ज्याने कोणी पाहिला तो त्या शॉट वर फिदा झाला नाही, तर नवलचं !! ही संवाद लेखकाची जादू तर आहेच पण तो ज्या ताकदीने अमितजींनी सादर केला आहे त्यास आजतागायत तोड नाही. ७० च्या दशका पासून ते अगदी ९० च्या दशका पर्यन्त कथा, पटकथा आणि संवाद यावर मजबूत पकड असणारे दोन मित्र ! ज्यानी बॉलीवूडला अनेक हिट्स, सुपर डुपर हिट्स चित्रपट दिले,  अनेकांचे संसार या जोडीमुळे उभे राहिले, हो संसार ! आजही ही मंडळीनी “शो” ची तिकटे सांभाळून ठेवलेली आहेत. ज्यावर त्यांची पहिली कमाई झाली , ती तिकिटे !! थोड आश्चर्य नक्कीच वाटेल पण खरं आहे. तर, दमदार संवाद, कथा आणि पटकथा याचे धनी सलीम-जावेद, यांनी चित्रपटात अनेक प्रयोग केले. “अँग्री यंग मॅन” हे बिरुद अमितजीना यांच्या मुळेच मिळालं ! प्रकाश मेहरा यांना “जंजीर”च कथानक आवडलं पण या कथेत चित्रपटाच्या नायकास एकही गाणं नव्हतं, (संगीत प्रधान चित्रपटांचा काळ) त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांनी “जंजीर” नाकरला होता. त्यातच एके दिवशी महमुद यांचा “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सलीम-जावेद ह्या जोडीने अमितजीना पाहिलं आणि त्यांचे नाव प्रकाश मेहरा यांना सुचविले. अनेक नकार पचवलेले प्रकाश मेहरा यांनी अमितजीना या चित्रपटासाठी करार बद्ध केलं आणि, रेस्ट इज हिस्टरी !!

          “ये पुलीस स्टेशन है, तूम्हारे बाप का घर नही” म्हणणारा नायक त्या काळी प्रथमच रसिकांनी मोठ्या पडद्यावर पाहिला आणि ह्या नव्या नायकास लोकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं. “जंजीर” सुपर हिट झाल्यावर देअर इज नो लुकिंग बॅक फॉर अमिताभ !! चित्रपटात नायकास स्वप्नात त्याच्या आई-वडिलांचा खूनी घोड्यावर येणं आणि जंजीर दिसणे, नायिका ओळख परेडला नकार देणे, त्यानंतर उद्विग्न झालेला नायक, आजू-बाजूस होत असलेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठविणारा नायक आणि तितकाच कुल पण दुष्ट, छद्मी  खलनायक “तेजा”, किंवा दीवार मधील “अगले हप्ते एक और कुली हप्ता देनेसे इन्कार करेगा”, ह्या गोष्टी बॉलीवूड मधील टिपिकल गोष्टीत मोडत नव्हत्या , कदाचित त्यामुळेच हे सारं रसायन लोकानां भावलं आणि खऱ्या अर्थाने पडद्यावर “अँग्री यंग मॅन”,चा जन्म झाला. समाजात त्याकाळी उपलब्ध सुविधांची वानवा , तत्कालीन सरकारची विविध धोरणं त्यातच अचानक लावलेली आणीबाणी ह्याचा वापर करून सामान्य माणसास मोठ्या पडद्यावरील “नायकाचे” रुप देण्यात सलीम-जावेद यशस्वी झाले असे म्हणालो तर वावगं ठरणार नाही.

          ह्या जोड गोळीच्या चित्रपटातील नायिका देखील तेवढीच पुढारलेली , सक्षम दाखविण्यात येत असे, यांचा कोणताही चित्रपट पहा त्यामध्ये नायिका स्वतंत्र विचारांचीच तुम्हाला दिसेल. मग तो चित्रपट सीता और गीता असेल,  जंजीर, दीवार असेल,  मि. इंडिया अथवा द हीस्टॅारीक “शोले” असेल प्रत्येक चित्रपटात नायिका सक्षम दाखविण्यात आली आहे. त्या काळात हे पडद्यावर चितारणे म्हणजे “आउट ऑफ द बॉक्स” विचारच होते. रसिक मायबापांना देखील ही कल्पना रुचली. कथेला महत्व आहे हे वारंवार सिद्ध करण्यात सलीम-जावेद यांना यश आलं असेच मी म्हणेन. किंबहुना कथा-पटकथाकाराचे  नाव ठळक पणे चित्रपटाच्या पोस्टर वर प्रिंट करण्यात याव असेही त्यांना वाटे त्यानुसार त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरवर स्वत: रात्री तून नाव प्रिंट केली होती.

          लेखक हा त्याला आयुष्यात येणाऱ्या अडचणी, दू:ख, कथेत मांडण्याचा प्रयत्न करतो, यामुळे वाचक बऱ्याच वेळा या गोष्टी स्वत:शी कनेक्ट करतो त्यामुळे लेखकाच्या भावना अगदी सहज पोहोचण्यास मदत मिळते. हाच धागा पकडून ह्या “ड्युओनी” त्यांच्या भावना रसिकांपर्यंत फोहोचविल्या. दोघांनाही आईचं प्रेम कमीच मिळालं त्यामुळे त्यांनी चित्रपटात आईला अनन्य साधारण महत्व दिले. एकंदरीत चित्रपट म्हणजे काय तर ईमोशन्स, ड्रामा यांचा संगमच !

          नुकतीचं “अँग्री यंग मेन” ही वेब सिरिज पाहण्यात आली आणि मग यावर आपणही लिहावं असे मनापासून वाटलं म्हणून हा लेख प्रपंच ! सलीम-जावेद यांचे चित्रपट म्हणजे नवोदित चित्रपट लेखकांसाठी विविध केस-स्टडीज आहेत असे मला वाटतं. खरं तर क्षमता असताना प्रस्थापित सिस्टिम मुळे मिळालेल्या नकारा विषयी, स्वत:च्या वाटेला आलेल्या अपमान, झालेल्या अवहेलने विषयी प्रत्येकाच्या मनात राग असतोच, तो कोणत्या कोणत्या प्रकारे माणूस व्यक्त करायचा प्रयत्न करतो पण प्रत्येकास ते साध्य होईलच असे नाही, पण तीच भावना रुपेरी पडद्यावर एखादा नायक करीत असेल तर रसिक माय-बाप नक्कीच साथ देतात हा एक कान मंत्रच म्हणावा, हो ना ?

अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, सल्लागार, लेखक, सॉफ्ट स्किल ट्रेनर, व्याख्याता  

संचालक  विद्या कॉम्प्युटर्स , सोलापूर

संचालक- थिंक ट्रान्स फाऊंडेशन, पुणे- सोलापूर चॅप्टर 

सोलापूर  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

ब्रॅंडींग लीडरशिप