मनातलं

“पुष्पा”, आय हेट टिअर्स”, “अमर
प्रेम” चित्रपटातील फेसम डायलॉग ! जितक्या सहजतेने राजेश खन्ना यांना हे साध्य
झालं आहे ती क्वचितच कुणास जमलं असतं, ती एक राजेश यांची स्टाइलच होती. मी एक डाय-हार्ट
अमिताभ बच्चन फॅन आहे पण आज राजेश खन्ना यांच्या विषयी लिहितो आहे. त्याचे कारण म्हणजे
त्यांचे काही अप्रतिम चित्रपट ! अनेक फॅन्सच्या काळजाचा ठेका चुकवेल अशाच स्टाइल
राजेश मिरवीत असतं. स्टारडम काय असतं आणि ते कॅरि करणं हे सारं बॉलीवुडने प्रथम
अनुभवलं ते राजेश खन्ना यांच्या मुळेच ! सलग १५ चित्रपट सुपरहिट ! असा रेकॉर्ड
देखील राजेश यांचेच नावे आहे. आणि अद्याप त्याची बरोबरी करण्यात कोणत्याच कलाकारास
यश मिळालेलं नाही. राजेश यांच्या पूर्वी देखील स्टार होते, पण राजेश यांनी तो काळ
गाजवला ! युवतींनी रक्तरंजित पत्रं प्रथम याच कलाकारास लिहिली गेली असं वाचण्यात
आहे. चित्रपटास उत्तम संगीत, किशोरचा सदाबहार आवाज साथीला, नव कथानक आणि सहज
अभिनयाच्या जोरावर राजेश यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. राजेश यांच सुरुवातीच्या
काळातील अनेक चित्रपट एका पेक्षा एक आहेत पण सदैव लक्षात राहिलेले सदाबहार
अभिनयाने नटलेले म्हणाल तर, आनंद, दो-रास्ते, दुश्मन, अपना देश, आराधना, हाथी मेरे
साथी, कटी पतंग, सफर, आप की कसम , बावर्ची , खामोशी आणि “अमिताभ” युगाची सुरुवात
होण्याच्या पूर्वीचा नमक हराम. या साऱ्या मूवीज आजही फ्रेश वाटतात, पहाव्या
वाटतात. कदाचित या यादीत “सत्यम शिवम सुंदरम”, हा चित्रपट देखील समाविष्ट झाला
असता कारण यासाठी राजेशच प्रथम पसंतीचे कलाकार होते.
“आनंद”
या एवरग्रीन चित्रपटात भूमिकेसाठी कोणतेही मानधन घेतले नाही, हे शूटिंग केवळ २८
दिवसांत पूर्ण करण्यात आलं. राजेश यांनी काळजी पूर्वक रोज दोन तास चित्रपटाच्या
शूटिंगसाठी कसे देता येतील याकडे लक्ष दिलं, अगदी झोकून देऊन काम केलं.
त्यांच्यातील व्यावसायिक राजेशने या चित्रपटाचं वितरण “शक्तिराज फिल्म्स” या
त्यांच्या कंपनी मार्फत केलं आणि एक नायक म्हणून जेवढं मानधन ते कमवू शकले असते
त्यापेक्षा दशपटीने अधिक त्यांनी चित्रपटाच्या वितरणातून कमविले. छोट्या पडद्यापासून
राजेश दूर राहू शकले नाहीत हे फार कमी लोकाना माहिती असावं. दोन प्रॉडक्टच्या जाहिराती
मधून राजेश यांनी ग्राहकांना, त्यांच्या फॅन्सना भुरळ घातली, एक बॉम्बे डाईंग आणि दुसरी
जाहिरात हॅवेल्स फॅन्सची होती, या जाहिराती मध्ये त्यांनी त्यांच्या फॅन्सना एक प्रकारे
आदरांजलीच वाहिली होती. यश चोप्रा यांच्या सोबत इत्तेफाक आणि दाग हे दोन चित्रपट राजेश
यांनी केले. दोन्ही हिट ! असे म्हणतात की “यशराज” हा यश चोप्रा यांचा बॅनर यातील यश
आणि राज हे दोघांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. ऑल टाइम हिट दिवार साठी यश चोप्रा यांची
पसंती राजेश होते पण सलीम-जावेद यांच्या सोबतच्या मतभेदा मुळे त्यांना कास्ट करता आले
नाही.
कारकिर्दीच्या
यशोशिखरावर ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ कुणीच राहू शकत नाही. राजेश पण त्यास अपवाद
नव्हते, डाऊनफॉल सुरू झाल्यावर मान तिरकी ठेवून संवाद, विचित्र कटाक्ष , कपाळावर
अनंत आठ्या, जास्त ताठरपणा दाखवणं आणि अभिनया मध्ये तोच तोच पणा दिसून येऊ
लागल्यावर रसिक श्रोत्यांनी चित्रपटा कडे पाठ फिरवायला सुरुवात केली. याच काळात
कोणतेही, अगदी मिळतील तसे चित्रपट राजेश यांनी स्वीकारले यामुळे देखील फॅन फॉलो
कमी झाले असावेत. मला कधी कधी वाटतं आताच्या काळातील सोशल मीडिया त्याकाळात उपलब्ध
असता तर स्टारडम काय असू शकलं असतं? ज्याप्रमाणे आज इंफ्लुएंसर आहेत अगदी त्याच
प्रकारे राजेश यांनी चित्रपटा व्यतिरिक्त देखील सोशल मिडियावर धुमाकूळ घातला असता.
अंतिम समयी त्यांचे शब्द
होते, “टाइम हो गया है, पॅक अप !”, अमिताभ
यांनी या विषयी माहिती दिली होती. आज राजेश यांना आपल्यातून जाऊन तेरा वर्षे झाली पण
राजेश प्रत्येक फॅन्सचा मनात आजही घर करून आहेत.
“आनंद मरा नही, आनंद मरते
नही “
अमित बाळकृष्ण कामतकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा