पण, परंतु .. आणि निर्णय
अनेकदा आयुष्यात काही निर्णय आपण त्या क्षणाच्या उपलब्ध साधनांवर , परिस्थितीवर आणि आपल्या समजुतींवर घेतो. त्या वेळी ते निर्णय अगदी योग्य वाटतात. पण काळ पुढे सरकतो , अनुभव वाढतात , आणि मग मागे वळून पाहताना काही प्रश्न मनात ठाण मांडून बसतात—“तो निर्णय योग्य होता का ?”, “ मी वेगळी वाट निवडली असती तर काय झालं असतं ?” अशा प्रश्नांचं ओझं हळूहळू मनावर साचतं आणि एक प्रकारचं ‘शल्य’ मनात निर्माण होतं. खरं तर निर्णय घेताना आपण त्या काळात ‘प्राप्त’ आणि ‘पर्याप्त’ अशा गोष्टींचा विचार करतो. जे मिळालं आहे आणि जे पुरेसं वाटतंय , त्याच्या आधारे आपण पुढे जाण्याचा मार्ग ठरवतो. त्या क्षणी तो निर्णय पूर्णपणे तर्कसंगत आणि योग्य वाटतो. पण आयुष्य ही एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे. परिस्थिती बदलते , माणसं बदलतात , आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली विचारसरणी बदलते. त्यामुळेच कालांतराने घेतलेले निर्णय नव्याने तपासून पाहावेसे वाटतात. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—विचारांचं पीक. एकदा का मनात एखादा विचार रुजला की तो वाढत जातो. त्याला खतपाणी मिळतं अनुभवांचं , तुलना करण्याचं , आणि ‘जर-तर’च्य...