फॉलोअर

माहिती तंत्रज्ञान व्यतिरिक्त

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व : पु.ल.
पु.ल. ,बद्दल मी काही लिहावे असे कधीच मनातही आले नव्हते पण आज काय माहिती उगाच राहून राहुन वाटू लागले कि जमलं तेवढं लिहावे या थोर व्यक्ती बद्दल....हे म्हणजे, म्हणतात ना काजव्याने सूर्याला प्रकाशा बद्दल सांगावे... पु.ल. म्हणजे महाराष्ट्रास लाभलेलं एक शंभर नंबरी सोनं ! महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ! अफाट लोकप्रियता, अचाट शब्दसंग्रह म्हणजे पु.ल. !  पु.ल. म्हणजे बटाट्याची चाळ, पु.ल. म्हणजे अंतू बर्वा, पू.ल. म्हणजे कथाकथनकार ,पु.ल. म्हणजे संगीतकार ज्यांनी आजही “नाच रे मोरा”  गाण्यावर ठेका धरायला भाग पाडलं आहे, पु.ल. म्हणजे नाटककार, जे म्हणतात तुज आहे तुपाशी, अगदी सहजतेने  “फुलराणी” बद्दल व्यक्त होतात , शिवाय “अंमलदार” हि होतात आणि “असा मी असा मी” वावरताना “वाऱ्यावरची वरात” करणारे पु.ल. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व ! सगळ्यांना आयुष्यभर हसविले, अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर “जे ब्रह्मदेवास जमले नाही, ते त्यांनी केले, “ सगळ्यांना हसविले आणि अंतर्मुख हि केले ” मला तर असही वाटतं पु.ल. म्हणजे अद्यापही न उलगडलेलं कोड ! या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शब्दांची वानवा कधीच भासली नाही.
सगळ्यांच्याच आयुष्यात सुख आणि दु:ख आहेतच, पण आपल्या वाट्याचे (त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर “कोट्यातील”) दु:ख लवकर संपविता आले कि पुढे सगळे सुखचं उरते. स्वत:च्या आयुष्यात देखील पु.ल. नी हेच तत्व पाळले. पु.ल.चे लेखन वाचताना जेवढा आनंद मिळतो तितकाच त्यांचे कथा कथन ऐकताना मिळतो आणि अभिनय देखील तितकाच आनंद देवून जातो. निवडक पु.ल. या कार्यक्रमा बद्दल एका कथाकथनात पु.ल. म्हणाले होते, त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना प्रश्न केला कि “निवडक म्हणजे काय?, निवडीचे निकष कोणते?” या चर्चे मध्ये “वाच्च पदार्था मधून , “खाद्य पदार्थात” गेलेला “शब्द” आणि केलेली “कोटी”, या “कोटीस” शतशत नमन ! पु.ल. ची जन्म शताब्दी साजरी करताना सगळे अगदी हर्षोल्हासात रंगून गेले आहेत, नव-नवीन कार्यक्रमाच्या माध्यमांतून या अष्टपैलू व्यक्तिमत्वास आठवायचा आणि त्यांना त्यांच्याच शैलीत सुमनांजली वाहण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी ही पु.ल. ना हि शब्द सुमनांजली !
अमित बाळकृष्ण कामतकर
१८/१२/२०१८       

==================================================

श्रवण- एक संस्कार
एका पिढीने दुसऱ्या पिढीस संस्कार द्यावेत किंवा ते केले जातात (काही अपवाद वगळता) असं म्हणूया फार तर , मला आठवतं माझ्या लहानपणी बाबा किशोर, रफी, मन्ना डे, मुकेश यांची गाणी ऐकायचे (मी आजही ती गाणी ऐकतो), उत्तमात उत्तम ऐकणे, चांगल ऐकणे हा ही एक संस्कारच म्हणावा लागेल, किंबहुना आम्ही पहिला टेप रेकॉर्डर (फिलिप्स कंपनीचा) घेतला तेंव्हा देखील पहिली ऑडीओ कॅसेट जी आम्ही आणलेली ती “सदाबहार हिंदी गीतांचीच” होती आणि दुकानदाराने एक कॅसेट (लुप्त होत चाललेली गोष्ट) टेप रेकॉर्डर सोबत भेट म्हणून दिली होती ती होती, “मेंदीच्या पानावर”, त्याकाळचा प्रचंड गाजलेला वाद्यवृंद !! (माझ्या पिढीतील मंडळीना आठवत असावं), काय सुंदर मराठी गीत होती ती, आजही तेवढीच मनाला भावतात, “बच्चू पांडे” यांचं निवेदन आणि बहारदार गाणारे गायक कलाकार !! हे गायन (अगदी शास्त्रशुद्ध नाही पण सुरात) आणि श्रवण संस्कार आपल्या मुलांवर व्हावेत असं वाटतं म्हणून बऱ्याच वेळा मुक्त गायन आणि श्रवण (टेलिव्हिजन अथवा एफ.एम. वाहिनी,आकाशवाणी च्या सहाय्याने) करण्याचा माझा प्रयत्न असतो. माझी मुलं जेंव्हा जुनी हिंदी / मराठी सदाबहार गाणी एन्जॉय करतात तेंव्हा एक आंतरिक समाधान मिळतं. जे शब्दात व्यक्त करता येत नाही.  
काल रात्री टेलिव्हिजन वर ९० च्या दशकातील गाणी लागली होती, त्यात डीडीएलजे (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे) मधील कुमार सानू आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं “तुझे देखा तो ये जाना सनम” हे गीत लागलं, मी आपसूकच म्हणालो, “वा क्या बात है” , तेवढ्यात या दोन्ही गायकांच्या सुरात सूर मिसळत माझी चार वर्षाची कन्या “आरोही” ही गात होती, तेही पूर्णपणे सुरात, बहुतेक म्हणूनच आम्ही तीच नावं “आरोही” ठेवलं आहे, गाण्याचे बोल तुला कसे माहिती? असं विचारल्यावर म्हणते कशी, “मला
माहिती आहे”, ऐकलयं मी हे गाणं, आरोही असं म्हणाल्यावर माझ्या लक्षात आलं, घरात मी जेंव्हा गाणी प्ले करतो किंवा कार मध्ये गाणी प्ले होतात तेंव्हा हा  श्रवण संस्कार मुलांवर देखील होत आहे, त्यामुळेच जुनी बहारदार गीतं मुलं देखील एन्जॉय करत आहेत. किशोर यांच एखादं गाण लागलं कि माझा मुलगा “आदित्य” आवाज ओळखतो याचही कौतुक वाटतं. एक मात्र नक्की कि आजोबांच्या काळातील गाणी त्यांची नातवंडे आनंदाने ऐकतात याचा अर्थ घरातील वातावरण त्यास पोषक आहे म्हणूनच....
ऐकणे  (listening) हे ज्ञानार्जनात महत्वाच मानलं जातं. ई–लर्निंग च्या जमान्यात तर listening प्रोसेस ला अनन्यसाधारण असं महत्व आहे. मला वाटतं ही नवी पिढी चांगल ऐकू शकते त्यांना फक्त तशा प्रकारच्या इनपुटची गरज आहे आणि ती एक पालक म्हणून आपण पुरविली पाहिजे आणि याची सुरुवात घरापासून करायला काही हरकत नसावी....
अमित बाळकृष्ण कामतकर  
=============================================
स्मार्ट सोलापूर, स्वच्छ सोलापूर- जागो रे !!!

स्वच्छ भारत मिशन मध्ये सोलापूर महानगरपालिका देखील आपला सहभाग देत आहे हे जेंव्हा समजले तेंव्हा वाटलं प्रशासना कडून खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे त्यावेळी मनात विचार आला कि सोलापूरकरांनी यास प्रतिसाद दिल्यास स्वच्छ सोलापूर ही संकल्पना अस्तित्वात येण्यास वेळ लागणार नाही. याच दरम्यान मा.आयुक्तांनी सोलापुरातील कचरा कोंडाळे काढून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला, या मागे त्यांची भूमिका स्पष्ट होती कि कचरा संकलन करणाऱ्या गाड्या (नवीन गाड्याही ताफ्यात उतरविल्या आहेत) घरोघरी जातील, नागरिक दारात आलेल्या कचरा गाडीत ओला आणि सुका (यासाठी वेग-वेगळ्या स्टीकर लावलेल्या डस्टबिन देखील वाटप करण्यात आल्या..[अर्थात महापालिकेकडून] ) असे कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा जमा करतील त्यामुळे रस्त्यावरील कचरा कोंडाळ्याची गरज भासणार नाही. थोडे दिवस हा प्रयोग यशस्वी होतोय असं वाटत असतानाच अचानक कचरा संकलन गाडी (घंटा गाडी) गायब झाली, (आज १० दिवस झाले गाडी आलीच नाही) नागरिकांना सवय लागत आहे म्हणे पर्यंत या गाडीने घंटा च दाखविली ....
कचरा कोंडाळा काढून टाकलेला त्यात घंटा गाडी येत नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. याबाबतीत झोनल आरोग्य निरीक्षक यांना याची कल्पना दिली असता त्यांनी माझ्या फोन ला सकारात्मक घेतले आणि असाच अभिप्राय देत रहा असे सुचविले. घंटा गाडी का आली नाही याची माहिती घेतो आणि गाडी पाठवायची व्यवस्था करतो असा आश्वासक संवाद त्यांच्याशी झाला.   शासनाच्या (केंद्र असो वा राज्य) योजनेस यशस्वी करण्यासाठी प्रशासन, कर्मचारी आणि नागरिक यांचा त्रिवेणी संगम होणे आवश्यक असते हा त्रिवेणी संगम सोलापुरात झाल्यास खरचं सोलापूर - स्मार्ट सोलापूर घडेल असा विश्वास वाटतो....
          प्रशासनाने घंटा गाडीचे  नियोजन आणि अंमलबजावणी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असं वाटते आणि सोबतच नागरिकांनी देखील याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे असे सुचवावे वाटते. नागरिकांनी देखील कचरा हा या घंटा गाडीतच जमा करावा, कचरा कोंडाळा नाही म्हणून रस्त्यावर इतस्त: टाकणे टाळावे.
          आशा करूया लवकरच कचरा मुक्त सोलापूर पहायला मिळेल.....
माहितीस्तव : मागील वर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यानी स्वच्छता MOUD अॅप वापरण्याचा सल्ला दिला होता (तसे जाहिरातीचे फलक लावून जनजागृती ही केली होती )आणि परिसरातील अस्वच्छतेचे फोटो काढून अपलोड करावेत त्याचे निराकरण त्या त्या झोन मार्फत केले जाईल असं सांगण्यात आलं होत, मी एक-दोन वेळा प्रयत्न देखील केला त्यास सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला. (स्वच्छता अॅप (Ministry of Urban Development)- प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येते.)

# Be the change
#स्वच्छ भारत
#स्वच्छ सोलापूर- स्मार्ट सोलापूर

अमित बाळकृष्ण कामतकर
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------




--------------------------------------------------------------------------------------------------------------

तुझे रूप चित्ती राहो

देह धारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म

सदाचार, निती हूनी आगळा ना धर्म

तुला आठवावे गावे हाच एक नेम

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम

-ग.दि.माडगूळकर

संत नेहमीच समाजास योग्य मार्ग दाखवितात, त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग आपले जीवन सुखी करण्यास मदतच करते. संत गोरा कुंभार या चित्रपटातील ग.दि. माडगुळकर यांनी लिहिलेले हे गीत किती साध्या आणि सोप्या शब्दात संत गोरा कुंभार (गोरोबा) यांची विठ्ठल भक्ती व्यक्त करत आहे आणि सोबतच समाजास कानमंत्र हि देत आहे. १९६७ साली आलेल्या “संत गोरा कुंभार” या चित्रपटातील हे गीत, गीतकाराने “गोरोबांची” विठ्ठल भक्ती सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि सोबत एक संदेश हि दिला आहे.  प्रत्येक देह धारण केलेल्या जीवास नित्य कर्म करणे काही चुकलेले नाही, कर्म करणे अनिवार्य आहे आणि ते देखील विठ्ठलाने नेमून दिलेले आहे. असे कर्म करीत असताना सदाचार आणि निती या दोन्ही व्यतिरिक्त दुसरा धर्म नाही, आजच्या युगात मला वाटत हेच काय ते मिसिंग आहे. सदाचार, निती म्हणजे काय? असे जरी कुणी विचारले तरी आश्चर्य ते काय ? सदाचार कोणत्या “आचाराच्या” दुकानात मिळतो कि अंगिकारावा लागतो ? तर तो अंगिकारावा लागतो त्याचे अनेक फायदे मिळतात पण तो नित्य-नियमाने पाळावा लागतो, हे पाळणे सगळ्यांनाच जमते असे नाही, पण ज्यास जमते त्यास “फळे रसाळ गोमटी” मिळतात, येणाऱ्या अडचणी, मिळणाऱ्या यातना या सर्वांना सामोरे जावूनच त्याचे फळ मिळते, असे संत सांगतात..

सदाचार अंगीकारायचा म्हणजे काय तर लहानपणी गोष्टीत ऐकलेल्या “हातिमताई” सारख व्हायचं आणि त्याने शोधलेल्या “नेकी कर दरिया में डाल” या प्रश्नाच्या उत्तरा सारखं नेकी (भलाई) करत राहायची, पण अस वागणं डिफिकल्ट आहे बुवा ! अस काही जमणार नाही, मग सदाचार अंगिकारावा तर कसा? मला वाटतं जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीची जाणं असली कि बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात. एक सहज सुचलं म्हणून यावरच एक उदाहरण पहा ना, सध्या दुध दरावरून शासन आणि शेतकरी बंधू मध्ये सध्या रणकंदन (दुसरा शब्द न सुचल्याने हा वापरला) सुरु आहे. ज्या दुधावर आपली रोजी-रोटी चालते तेच दुध, त्यास दर मिळावा यासाठी रस्त्यावर फेकून द्यायचं ? त्यास काहीच किंमत नाही. ते रस्त्यावर फेकण्या आधी किमान दुध देणाऱ्या गाई-म्हशी ना तरी आठवावे....बळीराजा दर वाढवून मागत आहे त्यामागे नक्कीच काही कारणं असतील हि, मी त्यातील जाणकार नाही पण संत वचनांचा आधार जीवनास मदत करतो असे आपण पिढ्यान पिढ्या मानत आलेलो आहोत त्यावर चालत आलेलो आहोत मग आपली निती कुठे गेली? सदाचार कुठे गेला? काही स्वार्थी (हाच शब्द इथे योग्य वाटला) लोकांचे ऐकून बळीराजा  दुध रस्त्यावर फेकणार असेल तर ते कितपत योग्य आहे? याचा विचार व्हायला हवा.....

प्रिंट, सोशल, इलेक्ट्रोनिक मेडीया मधून टीकेची झोड उठते, (याचेही कारण तसेच आहे, दुध रस्त्यावर फेकताना फोटो सेशन होतो, एखादं, दुसरं बॅरल रिकामं केल जातं) काहीजण निषेध करतात मग लगेच दुसरे दिवशी (त्यामुळेच कि अजून काही कारण ते नाही माहिती) दुध वाटप झाल्याचे कळते, तशा पोस्ट फिरू लागतात मग हे आधीच का नाही होत? शासनाचा निषेध करायचाच असेल तर तो इतर मार्गानेहि करता येतो, दुध विक्रीस न ठेवता गोरं गरीब जनतेस विनामुल्य वाटप करता येवू शकतं, तसं करायचं नसल्यास एक सेवा म्हणून “वारीत” याचं वाटप होवू शकतं. त्यांची तहान भागवता येवू शकते, यातून पुण्यच मिळेल (एक भाभडी आशा), आजच्या वर्तमान पत्रात काही शेतकरी बांधावानी दुध वाटप केल्याच्या बातम्या वाचून बरे वाटले. हे करताना आपण डळमळलो तर विठ्ठलास आठवावे तो मदत करण्यास सक्षम आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||

अर्थात पापी लोकांचा अज्ञानरूपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो . प्राणी मात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.

विठ्ठल, विठ्ठल !

अमित बाळकृष्ण कामतकर  
-----------------------------------------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?