कष्ट, सातत्य आणि समाधान—व्यवसायाची खरी कमाई
व्यवसाय आणि आपण स्वत: एक वेगळच नातं तयार होते असे मी मानतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे पत्करता त्यास कोणत्याही परिस्थिती मध्ये निभावता येणं आणि जमणं हे एक मोठ्ठं दिव्य असतं. अर्थात या दिव्यातून जो यशस्वी पार पडतो त्यासच याचा आनंद घेता येतो. हा केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग नसतो , तर तो आपल्या अस्तित्वाचा , आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनून जातो. आपण ज्या गोष्टीची मनापासून निवड करतो , जिच्यावर प्रेम करतो , त्या गोष्टीशी एकनिष्ठ राहणं हे केवळ कर्तव्य नसतं—ती एक साधना बनते. आणि या साधनेतूनच खऱ्या अर्थाने समाधानाचा जन्म होतो. मागील २६ वर्षापासून व्यवसाय करीत असताना अनेक प्रसंग असे आले कि आता थांबाव ! ब्रेक घ्यावा, दुसरं काहीतरी पाहावं पण कामावर असणारी तुमची श्रद्धा, समर्पण तुम्हास एक जिद्द प्रदान करते आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी पंख देते. अनेक वेळा तर प्रेरणा दूत बनून अनेक मंडळी आली आणि त्यांनी मार्ग दाखविला, प्रोत्साहन दिलं, तुम्ही जे करत आहात त्याचां सार्थ अभिमान आहे अशी कौतुकाची थाप पाठीवर दिली , ऊर्जा दिली. हे प्रेरणा दूत अशावेळी प्रकट होतात जेंव्हा मन खचलेलं असतं, पुढे जाण्...