
कोणत्याही संस्थेसाठी / कंपनीसाठी
त्याचा कर्मचारी हा अॅसेट असतो. त्याच्या सहकार्याने संस्था/ कंपनी पुढे वाटचाल
करीत असते. कर्मचारी वर्गासोबत असणारे नाते हे कंपनीच्या / संस्थेच्या फायद्याचे
ठरत असते. अनेक उदाहरणातून हे सिद्ध झाले आहे कि जिथे कर्मचारी वर्ग आनंदी असतो
तिथे उत्पादन/ विक्री उत्तम होते. पण कर्मचारी वर्गसोबत नाते संबंध प्रस्थापित
करणे आणि सोबत एक लक्ष्मण रेषा आखून ठेवणे हे देखील तितकच महत्वाच असतं, हे
ज्यांना जमलं त्यांना व्यवसायातील महत्वाची बाब जमली असे मी म्हणेन. तुमच्या
कंपनीची काम करण्याची एक सिस्टम हवी, त्या सिस्टमनी तुमची कंपनी चालली पाहिजे, हे ध्यानात घ्यायला
हवे, बऱ्याच वेळा काय होतं, कर्मचारी त्यांच्या सोई प्रमाणे काम करतात आणि मग अनेक
अडचणींना तोंड देण्याची वेळ मालकावर येते, असं होऊ नये त्यासाठी सिस्टम तयार करा.
कंपनीतील कर्मचारी वर्गा सोबत कंपनीचे कंत्राट, भावनिक,
व्यावहारिक स्वरुपात संबंध प्रस्थापित होवू शकतात, यातील प्रत्येक पैलूस महत्व
द्यायला हवे. एक चांगला कर्मचारी संबंध कार्यक्रम हे सुनिश्चित करते की सर्व
कर्मचार्यांना नीट वागणूक मिळते आहे, कर्मचारी आणि व्यवस्थापकांमधील संबंध मजबूत करण्यास आणि
त्यांच्या दरम्यानच्या समस्या दूर करण्यास यामुळे मदत मिळते. मला वाटतं कर्मचारी संबंध
हे चार मुलभूत आधारस्तंभावर आधारित आहेत.
१.
मुक्त संवाद
२.
ओळख- मान्यता
३.
अविरत अभिप्राय
४.
कर्मचारीवर्ग विकास- एक गुंतवणूक
१.
मुक्त संवाद:- कर्मचारी वर्ग हा दिवसातील महत्वाचा वेळ तुमच्या कंपनीत घालवत
असतो, याची जाणीव असायला हवी. त्यांना संवादाचे सर्व पर्याय उपलब्ध ठेवता येतील
असे पाहावे. हा संवाद तुमच्या व्यवस्थापकाशी असेल अथवा थेट तुमच्याशी असेल, पण तो
व्हायला हवा याकडे लक्ष द्या. तुमचा कर्मचारी हा व्यवस्थापका सोबत काम करण्यास
कम्फर्ट झोन मध्ये असावा. यामध्ये सिम्पल फंडा म्हणू आपण, ABC – Always Be
Communicating, तुमच्या कर्मचारी वर्गास हे कळू द्या की तुम्ही त्यांच्या कार्याबद्दल
किंवा त्यांना आवश्यक असलेल्या कशाबद्दलही बोलण्यासाठी , मदतीसाठी आहात आणि जेवढी
पारदर्शकता ठेवता येईल तेवढी ठेवावी.
२.
ओळख-मान्यता:- “बोल दो मीठे, बोल, सोनिये” अस एक गीत आहे, अगदी हेच गीत लक्षात
ठेवून वाटचाल करावी. तुमच्या कर्मचारी वर्गाशी आपुलकीने बोला, त्यांची काळजी घ्या,
त्यांनी काम उत्तम केल्यास त्यांचे कौतुक करा, हे कौतुक सर्वांसमोर करा, काम
चुकीचे झाल्यास तुमच्या केबिन मध्ये बोलावून त्याविषयी समज द्या (सर्वांसमोर
टाळा). एका सर्वेक्षणानुसार ७७% टक्के कर्मचाऱ्यांचे त्यांनी केलेल्या विशेष
कार्याचे कौतुकच होत नाही, हे तुमच्या कंपनीसाठी घातक ठरू शकतं, याकडे जास्त लक्ष
द्या. इंसेंटीव्ह, पुरस्कार अशा विविध योजना राबविण्यात याव्यात ज्यामुळे कर्मचारी
वर्ग उत्साहात काम करेल.
३.
अविरत अभिप्राय:- आपल्या कर्मचार्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल
वारंवार अभिप्राय देणे आणि त्यांनी कोठे आणि कशी सुधारणा करावी यावर विधायक टीका
करणे आपल्या कर्मचारी वर्गा सोबत सकारात्मक संबंध वाढवण्यास आवश्यक आहे. कर्मचार्यांना
अभिप्राय हवा असतो, हे आपण जाणले पाहिजे आणि त्यानुसार केले पाहिजे, त्यांना शिकण्याची आणि कामगिरी
वाढवण्याची आणि सुधारण्याची इच्छा आहे हे ताडले पाहिजे. मासिक वन टू वन सारख्या
वारंवार अभिप्राय सत्रांचे आयोजन करुन त्यांना ते घेण्यासाठी प्रवृत्त केले
पाहिजे. आवश्यक सल्ले व मार्गदर्शन देऊन त्यांचे कौतुक करता येऊ शकते. आठवड्यात एक
दिवस नक्की करावा त्यादिवशी कर्मचारी वर्गा सोबत सभा घ्यावी, अडचणी, त्यांचे सल्ले
या विषयी चर्चा करावी.
४.
कर्मचारी वर्ग विकास- एक गुंतवणूक: - कर्मचारी वर्गाच्या विविध मागण्या असू
शकतात, त्या व्यावसायिक असतील अथवा भावनिक नाहीतर घरगुती त्या समजून घ्या, त्या
कशा प्रकारे तुम्ही मदत करू शकता हे पहा, त्यांना विश्वास द्या कि तुम्ही आहात, हे
करत असताना विविध आघाड्यांवर व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे लागले तर त्याची सुविधा
देऊ करा, ज्यामुळे कर्मचारी वर्गाच्या कामगिरीत सुधारणा होईल. एक सत्य तुम्ही
जाणायला हवेच, “जो कर्मचारी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खुश असेल तो उत्तम कामगिरी
करेल”.
आज इथे थांबतो, भेटू
पुढच्या लेखात नवीन विषयासह.
कर्मचारी वर्गाशी उत्तम
संबंधासाठी शुभेच्छा !!
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं
फोटो: गुगल स्नेह**
great .... मालकांनी काय काय करावे हे खुप सोफ्या भाषेत सांगितलात.... आता पुढे कर्मचा-यां बद्दल लिहा
उत्तर द्याहटवाहो नक्की
हटवा