फॉलोअर

लेख शतपुर्ती

 

लेखनाची आवड तशी कॉलेज मध्ये असल्यापासूनच होती पण लिहितं व्हावं अशी मनानं उचल खावून त्याचं प्रत्यक्ष कृतीत रुपांतर होवून विविध विषयांवर लेखन करीत आज तुम्हा वाचकांसमोर शंभरावा लेख सादर करताना प्रचंड आत्मिक समाधान मिळत आहे. तसा मी काही लेखक, साहित्यिक नाही पण जे ज्यावेळी जस सुचलं तस कागदावर उतरवलं एवढचं !! या लिखाणामध्ये प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान विषयातील विविध नव्या घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. सोबतच आयुष्यात येणारे कडू-गोड अनुभव देखील कागदावर उतरवले...... यातील काही लेखांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला, हो ,हो माझ्यासाठी  “अभूतपूर्वच” कारण लेख पोस्ट केला आणि तो सोशल मीडिया माध्यमातून पाठविला कि वाचक ऑनलाइन यायचे आणि तंत्रज्ञानाच्या कमालीमुळे मला याची देही याची डोळा पहायला मिळायचं, काही वाचक मंडळीच्या कमेंट्सने वेगळीच ऊर्जा मिळायची, कारण कमेंट्स म्हणजे काय तर “ऑनलाइन संवादच” कि !! नाही का ? आभासी संवाद म्हणू फार तर आपण यांस....

     


  मला आठवतं पहिली पोस्ट ब्लॉग (https://amitkamatkar.blogspot.com) वर टाकली आणि सोशल मेडिया मध्ये आवाहन केल “ब्लॉग पहावा”, अर्थात मित्र-परिवारातून या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आणखी चार पोस्ट (विविध विषयांवर) मी पोस्ट केल्या त्यालाही खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि पहाता पहाता पेज पाहणाऱ्यांची संख्या पाचशेच्या वर (हि संख्या आज १३,८५३ एवढी आहे) गेली आणि हा आकडा सतत वाढतो आहे. माझ्या पोस्ट केलेल्या “सेवाभाव”या पोस्टने काहीतासात वाचकांची “शंभरी” गाठली म्हणजे शंभर लोकांनी पोस्ट वाचली, आता तर एकूण पोस्टची संख्या शंभर झाली आहे. वाचकांमध्ये सर्वात जास्त संख्या स्मार्ट फोन धारकांची आहे, डेस्कटॉप कॉम्प्युटर्स धारक साधारण ९.१% एवढे आहेत. वाचक संख्या वयोगट १८ ते ६५+ , (५५ ते ६५+ या वयोगटात ११% वाचक मंडळी आहेत हे विशेष). ५५% पुरुष वाचक तर ४५% महिला वाचक वर्ग या प्रवासा दरम्यान माझ्या लेखांना लाभला. ऑनलाइन वाचक हा भारत, अमेरिका, संयुक्त अरब-अमेराती, अर्जेन्टिना, या ठिकाणाहून जॉईन होतो आणि लेख वाचतो (हे महत्वाचं), या सर्व मंडळींनी ब्लॉगवरील लेखावर कमीत कमी तीन मिनिटे वेळ दिला असे मुद्रण माझ्याकडे उपलब्ध आहे. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद.  

          हे लिखाण असचं सुरु रहावं यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात का? तर नाही आपसूकच लिखाण कागदावर उमटतं, आपसूकच विचार शब्दांचा आकार घेतात आणि एखादा लेख पूर्ण होतो. फक्त नव्वद ते शंभर या दरम्यान मात्र नर्वस नायंटीजचा ब्लॉक आला होता त्यातून बाहेर पडून आज शतक पूर्ण करीत आहे. माझ्या बऱ्याच मित्रांना याच कौतुक देखील वाटत पण मी म्हणतो हे अगदी सहजच घडत ! त्यात काही विशेष नाही....हि मंडळी मग स्मित हास्य करतात आणि विषयाला अल्पविराम मिळतो !!!

          व्यक्त होण्यासाठी लिखाण करणं हे एक प्रभावी माध्यम म्हणता येईल असे आता वाटते. कारण बाबांच्या निधनानंतर बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या व्यक्त होणं, करणं कठीण होत्या त्या कागदावर उतरविल्या आणि मन हलक केल पण यातूनच अखंड लिहितं राहणं मला जमलय कि काय ? असा प्रश्न पडतो हल्ली ! असो.....माझे बाबा लिहायचे, त्यांनी बऱ्याच कथा लिहिल्या आहेत त्याचं संगणकीकरण करताना त्या वाचल्या गेल्या तेंव्हा लक्षात आलं कि, अरे, आपण तर बाबांसारख लिहितो ! केवढा अभिमान वाटला स्वत:च्या लेखनाचा, काय सांगू !! हा लिहिण्याचा वारसा बाबांकडूनच मिळाला आहे असेच मी मानतो.

          आज हि “लेख-शतपूर्ती ”  साजरा करावा या उद्देशाने सुरुवात करावी म्हणालो आणि पाहता पाहता विचारांची साखळी बनत गेली. बहुतेक वेळा हे असचं घडतं ! आजच्या निमित्ताने लेखनाची वही पुन्हा चाळली  गेली , कोण कोणते लेख कधी लिहिले यावर एक नजर टाकता आली, काही चुका लक्षात आल्या तर काही ठिकाणी आपल्याला हे कसं जमलं याचं आश्चर्य वाटलं ! आणि स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. विविध लेखांना ऑनलाईन करणे हेतू ब्लॉग ची सुरुवात केली आणि दैनिकाच्या माध्यमातून लेखन सुरु ठेवलं, वाचक वर्ग लाभणं हे देखील भाग्य च म्हणावे लागेल कारण एकीकडे मोबाईल, टेलीव्हिजन या मुळे  वाचन संस्कृती कमी होते कि काय असे वाटत असताना मिळालेला हा प्रतिसाद उर्जा देवून जातो.

          माझ्या विविध लेखांना भरभरून दाद देणाऱ्या माझ्या मित्रांना, आप्तेष्टांना आणि वाचकांना मनापासून धन्यवाद !! तसेच लेखनाची प्रेरणा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार. असेच विविध विषयांवर लेखन करण्याची सद्बुद्धी ईश्वराने द्यावी हि त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज थांबतो.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर  


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?